Pages

Pages

Pages

Tuesday, May 12, 2020

प्रामाणिक सेवेचं दुर्दैवी फळ

©️✍️©️✍️©️✍️©️✍️

_*प्रामाणिक कामाचे दुर्दैवी फळ*_

     नमस्कार मित्रांनो आजची सकाळ मुळात एक अतिशय धक्कादायक व मन विषण्ण करणाऱ्या घटनेनं झाकोळून गेली. संपूर्ण जग कोरोना नामक विषाणूच्या प्रादुर्भावाने प्रभावित झाले आहे जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत तर या कित्येक लोकांना याची लागण झाली आहे. सद्यस्थीतीतही याचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसागणिक मृतांमध्येही भरच पडत आहे. अविकसित, विकसनशील याबरोबरच प्रचंड विकसित व स्वतःला जागतिक महासत्ता समजणारे देशही कोरोनाच्या तडाख्यातून सुटले नाहीत तर त्यांच्याकडे होणाऱ्या प्रचंड मनुष्यहानीने हतबलही झाले आहेत.  

    एकूणच प्रचंड मोठी राष्ट्रीय आपत्ती सर्वच देशांवर येऊन ठेपली आहे. आपल्या देशात ही आता कोरोनाने  बऱ्यापैकी आपले हातपाय पसरले आहेत जवळजवळ सर्व देशभरात *कोरोना पोजिटिव्ह* रुग्ण आढळले आहेत. आपले महाराष्ट्र राज्य तर कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. आपल्या राज्यात मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरे कोरोना बाधित रुग्णाच्या धोकादायक संख्येच्या पुढे पोहोचली आहेत आणि त्यामुळे तेथील जनतेला अत्यंत कडक *लॉकडाऊनला* सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर सतत कोरोना लागण होण्याची टांगती तलवार त्यांचावर आहे.  

   याच दोन शहरात संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावातील  असंख्य लोक  काम, व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करून आहेत. आणि सध्याची या शहरांमधील धोकादायक स्थिती, बंद असलेले कामधंदे तसेच रीतसर परवानगीने गावी जाण्याची मुभा मिळाल्यामुळे एरव्ही गावाच्या नावाने नाकं मुरडणारे हे लोक सरसकट गावाकडे धाव घेत आहेत. साहजिकच जिल्हा, तालुका, आणि पर्यायाने ग्रामीण प्रशासनावर प्रचंड ताण वाढला आहे, कारण परवाना घेऊन का असेना पण धोकादायक प्रदेशातून येणाऱ्या सर्वाना कोणत्याही तपासणी विना किंवा काळजीविना सामावून घेणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते तसेच त्याचे गंभीर परिणामही सर्वानाच भोगावे लागू शकतात आणि म्हणूनच जिल्हा, तालुका व गावांच्या सीमेवर *तपासणी नाके* उभारून येणाऱ्या गाड्या थांबवून आतील लोकांची कसून तपासणी केली जात आहे. त्यांच्याकडील परवाने त्यांच्यामध्ये कोरोना विषयक काही  लक्षणे , ते कोणत्या ठिकाणाहून ते आले आहेत व कोणत्या गावी जाणार आहेत याबाबतची सर्व तपासणी केली जात आहे. योग्य परवाने व लक्षणेविरहित लोकांना गृह अलगिकरणाचा शिक्का मारून सोडले जात आहे तर लक्षणे सदृश्य लोकांना अधिक तपासणी साठी जिल्हा कोविड सेंटरवर संदर्भित केले जात आहे. 

   मित्रानो ! चेक पोस्ट वरील एव्हढ्या जबाबदाऱ्या केवळ आरोग्य कर्मचारी व पोलीस यांच्याकडून होणं शक्य नाही कारण एव्हढ्या मोठ्या संख्येने या दोन्ही विभागात मनुष्यबळ नाही शिवाय पोलीस व आरोग्य कर्मचाऱयांना चेक पोस्ट  व्यतिरिक्त यासबंधीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.  त्यामुळे शासनाला अधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे , आणि मग साहजिकच शासनाचे लक्ष शिक्षकांवर गेले नाही तरच नवल.

      मित्रानो प्रत्येक राष्ट्रीय कामात व आपत्तीमध्ये *शिक्षक हा आपली जबाबदारी प्रचंड प्रामाणिकपणे व तन मन धनाने पार पाडतो* हा आज पर्यंतचा अनुभव आहे आणि म्हणूनच कोरोनाच्या या राष्ट्रीय संकटाच्या काळात पुन्हा एकदा याच प्रामाणिक शिक्षक मनुष्यबळाची मदत शासनाने घेण्याचे ठरवले आणि सर्वत्रच चेक पोस्ट व इतर अनेक ठिकाणी प्रशासन , पोलीस व आरोग्य कर्मचाऱयांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक काम करताना दिसू लागले आहेत.

    कोणतेही रीतसर प्रशिक्षण नाही (अर्थात ते देण्यासाठी वेळ व स्थिती नाहीच पण वेगळ्या मार्गानी परिपूर्ण सुचना देता आल्या असत्या पण त्याही  नाहीत ) काम करीत असलेल्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुविधांची ( हँड सॅनिटाईजर, मास्क इ)  पण वाणवा आहे. पण कोणत्याही *परिस्थितीत तक्रार न करता आपले काम प्रसंगी स्वतः सुविधा उपलब्ध करून प्रामाणिकपणे पार पाडणे* हीच शिक्षकांची ओळख आहे जी की सर्वच विभागातल्या कर्मचाऱयांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.

    पण मित्रानो आजच्या दुःखद बातमीने हीच *विना तक्रार प्रामाणिकपणे* काम करण्याची वृत्तीच शिक्षकांच्या जीवावर उठली आहे की,  काय असे वाटत आहे.  

      सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका तपासणी नाक्यावर काम करणाऱ्या एका तरुण  शिक्षकाला ट्रकने उडवले व त्याचा मृत्यू झाला मित्रानो या बातमीने केवळ काम करणाऱ्याच नाही तर सर्वच शिक्षकांना धक्का बसला असून एक संतापाची भावनाही निर्माण झाली आहे.            

       शिक्षकांची तपासणी नाक्यावरील नेमणूक ही केवळ येणाऱ्या गाडीतील प्रवाशांची रजिस्टर मधील विविध मुद्द्यानूसार नोंद करणे (लिखाणाचे काम ) एव्हढीच आहे. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱयांनी गाड्या थांबवणे (कारण त्यांना पाहताच चालक गाडी थांबवतो तसेच या कामचा त्यांना अनुभव व सराव ही असतो ) विचारणा करणे व आरोग्य कर्मचारी यांनी त्यांची कोविड बाबतची लक्षणे तपासणे अशी कामाची विभागणी आहे. आणि या प्रत्येकाच्या कामासाठी प्रत्येकाने आपल्या ड्युटीच्या वेळेत पूर्ण वेळ प्रामाणिकपणे उपस्थित असणे आवश्यक आहे. एखाद्याच्या अनुपस्थितीने त्याचे काम दुसऱ्या ला करावे लागत असेल तर ते धोकादायक आहे. 

      सांगलीतील त्या चेकपोस्ट वर नेमकी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे एका शिक्षकाला आपले काम सोडून गाड्या अडवाव्या लागल्या व त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरावे लागले याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे.

 (✍️ दिपककुमार कांबळे 

उपशिक्षक - जि प शाळा शेवडेवस्ती, ता - शिराळा जि - सांगली )

     मित्रानो माझ्या लेखाच्या शिर्षकाचा हेतूच असा आहे की आपण प्रामाणिकपणे काम करतो हे सर्वथा योग्य आहे. दिलेलं काम जबाबदारी प्रत्येकाने प्रमाणिकपणेच पार पाडली पाहिजे पण कधी कधी हीच प्रवृत्ती आपल्या जिवावर उठत आहे माझ्या तरुण मित्राने ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला इतपत ठीक आहे पण जेव्हा तो थांबला नसल्याचे पाहून त्याने त्याचा पाठलाग केला व पुढे जाऊन गाडी आडवी घालून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला खरं सांगा मित्रानो इतकं करण्याची खरच गरज होती का ? एक तर अडवल्यानंतर तो ट्रक थांबला नाही तेव्हा त्यांनी ते इतरत्र कळवणे व शांतपणे बसने गरजेचे होते. पण माझ्या या बांधवाने पुढील धोकादायक कृती केली अर्थात मी त्याला दोष देतोय असे नाही पण आज त्याच्या घरचेही धाय मोकलून रडताना मनातून हेच म्हणत असतील. 

मित्रानो! आजचा दिवस आपल्या सर्व शिक्षकांसाठी दुःखद तर आहेच पण काहीतरी शहाणपण शिकण्याची संधी देणाराही आहे. अंशदान पेन्शन योजनेमध्ये असणाऱ्या या माझ्या बांधवांच्या कुटुंबाला कसा हातभार मिळणार या *प्रसंगाने नव्या पेन्शनचा धोकाही पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.* कोरोना बाबतीत काम करणाऱ्या पोलीस व आरोग्य कर्मचारी यांना शासनाने विमा संरक्षण दिले आहे पण हेच काम करणाऱ्या *शिक्षकांना मात्र अजून काहीही जाहीर केले नाही.*

  प्रशासनाने तर याची दखल घ्यावीच मात्र सर्व *शिक्षक संघटनांनी सुद्धा या माझ्या बांधवांच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांसाठी मदत मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करावे अशी विनंती करतो.*


   मित्रा, तुला शाश्रु नयनाने  भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या कुटुंबाला हे डोंगराएव्हढं दुःख पेलवण्याची शक्ती मिळावी ही प्रार्थना!!🙏🙏🙏


💐💐💐💐💐💐💐💐

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


©️ दिपककुमार कांबळे

उपशिक्षक - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवडेवस्ती, मांगले ता - शिराळा जि - सांगली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

13 comments:

  1. एवढे होवूनही कोरोना फायटर म्हणून शिक्षकाचे नाव येतं नाही आपल्या संघटना आणि प्रशासनाचे दुर्दैव आहे.

    ReplyDelete
  2. �� *दुःखद घटना, भावपूर्ण श्रद्धांजली*��

    एका ग्रुपवर मिळालेल्या माहितीनुसार सदर शिक्षक चेक नाक्यावरील ड्युटी करत होते. आपण आपली जबाबदारी व आपले मर्यादित अधिकार व स्व सुरक्षा यांचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्घटना घडू शकतात. ट्रकचा पाठलाग करून अडवणे ही ड्युटी आपली नाही, एवढं भान आपण ठेवणे आवश्यक आहे.
    कृपया सर्व बांधवांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी. जीवपेक्षा अधिक मौल्यवान काही नाही. पोलीस मित्र, आरोग्य मित्र, सर्वेक्षण, क्वारणटाईन कक्ष याठिकाणी ड्युटी करताना आपली शारीरिक उपस्थिती महत्वाची. अनावश्यक गोष्टी टाळाव्यात. आपली काळजी घ्यावी. कोणतेही अनुचित आदेश पाळू नयेत, किंवा जबाबदारी स्वीकारताना स्वतःची सुरक्षा, जपून काम करावे. ही विनंती����

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर सर आवल्या जिवापेक्षा काही मोठं नाही

      Delete
  3. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  4. योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करुया...

    ReplyDelete
  5. खूप वास्तववादी लेखन सर ... खरेच आहे .
    ..पोलीस प्रशासन जे काम करत आहे .. ते काम करण्याची गरज न्हवती ... कारण प्रशासन आता नुकसान भरपाई देईल ... आणखी काही दिवसांनी सर्व जन विसरून ही जातील ही घटना ... परंतु एका घरातील करता पुरुष कायमचा निघून गेला ही अपरिमित हानी भरून येणार नाही

    ReplyDelete
  6. नक्कीच प्रामाणिक सेवेचं दुर्देवी फळ
    भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  7. जाहीर निषेध.भावपूर्ण श्रद्धांजली.कदाचित मजबूत शिक्षक संघटना असती तर शिक्षकांना अशी कामे करावी लागली नसती व ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली नसती.शिक्षक संघटनेतून अशा कामांना कडाडून विरोध करणे गरजेचे आहे.उद्या युद्ध सुरू झाले तर रणभूमीवर पण जायला सांगतील.

    ReplyDelete
  8. दीपक सर ,हृदयस्पर्शी काळजाला भिडणाऱ्या शब्दात संवेदनशील वेदना आपण व्यक्त केल्यात.सर्व मुद्दे चिंतनीय.
    जान आणि जहां दोन्हीं जपुया.

    ReplyDelete
  9. प्रथम या आपल्या बांधवास भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏. वास्तव लेखन.हृदयद्रावक घटना आहे. मुळात चेकपोस्टवरची नेमणूक चुकीची आहे.प्रत्येक पदाची काम करण्याची एक मानसिकता असते.ती शारिरीक, मानसिक अनुभवाने तयार होते. शिक्षकने पोलिसांप्रमाणे नाइट ड्यूटी कधी केली आहे काय? त्याची शारिरीक कुवत आहे काय? ज्याच्या हातात खडू असतो त्याला अचानक काठी हातात देणे किती उचित आहे? त्याच्या मानसिकतेचा विचार करायला पाहिजे. आपत्तकालीन परिस्थीतीत शासनास सहकार्य केले पाहिजे पण प्रशासन आपल्या बुद्धीप्रमाणे शिक्षकाना कामास लावत आहे. शिक्षक त्यांच्या हातचे बाहुले झाले आहे. शिक्षणाचे मुख्य काम बाजूला राहिले.ज्या शिक्षणव्यवस्थेवर या महामारीचा दुरगामी परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक संकटामुळे पालकवर्गासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा परिस्थीतीत त्यानां समुपदेशन करणे हे शिक्षकाचे काम आहे.त्यासाठी शिक्षकाना सक्षम करण्यासाठी या वेळेचा त्याना उपयोग करु देणे महत्वाचे होते.तसेच नव्या तांत्रिक बाबी शिकण्यास त्याना वेळेचा उपयोग करता आला असता, पण शिक्षकास मुख्यकाम बाजूला ठेऊन अनेक अशैक्षणिक पात्रे निभवावी लागत आहेत. हे शिक्षणव्यवस्थेला घातक ठरणार आहे.

    ReplyDelete
  10. खुपच दुर्दैवी घटना

    ReplyDelete
  11. अतिशय हृदय विदारक चित्र आहे.सरांच्या कुटुंबीयांना सर्व स्तरातून मदत केली पाहिजे असे वाटते.

    ReplyDelete